
मुंबई: गतीमान प्रवासासाठी समृद्धी महामार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे. नागपूर-शिरडी हा या महामार्गाचा पहिला टप्पा सुरु झाला असून राज्य परिवहन महामंडळाने त्याचा लाभ घेत या मार्गावर नागरिकांसाठी विशेष बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या गुरुवारपासून नागपूर-शिरडी बससेवा या मार्गावरून सुरु होणार आहे. प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळ या मार्गावर शयन आसनी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बसमध्ये प्रवाशांना २X१ पध्दतीची ३० आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी उपलब्ध असून १५ शयन आसने (Sleeper) आहेत. ही बस नागपूर व शिरडी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री ०९.०० वाजता सुटेल व पहाटे ०५.३० वाजता गंतव्य ठिकाणी पोहोचेल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गावरील या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात १०२.५ कि.मी. व वेळेमध्ये सव्वाचार तासांची बचत होणार आहे. या बससेवेसाठी प्रति प्रौढ व्यक्ति रु.१३००/- व मुलांसाठी रू.६७०/- इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे. तसेच ७५ वर्षावरील ज्येष्ठांना १००% मोफत तर ६५ ते ७५ दरम्यानच्या ज्येष्ठांना ५०% सवलत असणार आहे.
नागपूर-औरंगाबादही सुरु होणार
समृद्धी महामार्गावर नागपूर ते औरंगाबाद (मार्गे जालना) शयन आसनी बससेवाही सूरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री १०.०० वाजता सुटेल व जालना मार्गे पहाटे ०५.३० वाजता पोहोचेल. सदर बससेवेमुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात ५०.९ कि.मी. व प्रवास वेळेमध्ये ४.४० तास इतकी बचत होणार आहे. सदर बससेवेमुळे नागपूर ते औरंगाबाद या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु. ११००/- व मुलांसाठी रु.५७५/- इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे तर नागपूर ते जालना या प्रवासासाठी प्रति व्यक्ति रु.९४५/- व मुलांसाठी रु.५०५/- इतके प्रवासभाडे आकारण्यात येणार आहे.
216 total views, 3 views today