
नागपूर : भारतात वैज्ञानिक परंपरा प्राचीन आहे.त्याकाळातही भारत जगाच्या पुढे होता. आधुनिक काळातही भारतात जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असून त्याचा प्रमुख आधार विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती हाच आहे. यानिमित्ताने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी. त्यात महिलांचे मोठे योगदान आहे. विश्वाचे अध्यात्मिक नेतृत्व भूषविणा-या भारताकडे एकविसाव्या शतकातील जगाचे नेतृत्व असेल हा आशावाद खरा ठरत आहे. असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
सायन्स काँग्रेसच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषी अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाची गरज- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलन, जाती भेद निर्मूलन क्षेत्रात कार्य केले. ग्रामविकासाचे कार्य करतांना विवेकवादी विचारांचा प्रचार केला. त्यांच्या नावाच्या विद्यापीठात ही काँग्रेस होणे हे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आज सावित्रीबाई फुले यांचीही जयंती आहे. महाराष्ट्रातील मनुष्यबळ हे सर्वोत्कृष्ट आहे. विज्ञानाला प्रोत्साहन देतांना त्यात कृषी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हा त्यामागील उद्देश आहे. कृषी अर्थव्यवस्था बळकट करणे हा प्रयत्न आहे. देशाच्या विकासात वैज्ञानिक प्रगतीचे महत्त्व असाधारण आहे. देशाने औषधनिर्मिती आणि हवामान शास्त्र यात प्रगती साधली असून त्याबाबत जगात लौकीक मिळविला आहे. त्यातून देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत झाली आहे यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.
विज्ञानामुळे होईल संसाधनांचे संरक्षण व प्रगती- उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या या भारतीय विज्ञान काँग्रेसची मध्यवर्ती संकल्पना ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही आहे. आज महिला सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ताकद हीच लिंगसमानता साधू शकते. जलवायु परिवर्तन, पर्यावरणावरील संकट यासारख्या महत्त्वाच्या समस्यांबाबत विज्ञान तंत्रज्ञान हेच उपाय शोधू शकते. संसाधनांचा कमित कमी ऱ्हास करुन प्रगती साधण्यासाठी विज्ञानच योगदान देऊ शकते. येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण कसे पर्यावरण सोडून जाणार आहोत. याबाबत उपाययोजना शोधणे हे कार्य विज्ञान तंत्रज्ञानातील विकासानेच होऊ शकते. कोरोनावर लस तयार करुन आपण देशातील व देशाबाहेरील अनेकांचे जीवन सुरक्षित करण्यात योगदान दिले आहे, हे विज्ञानामुळेच शक्य झाले. अशा विविध संकल्पनांचा विकास या काँग्रेसमध्ये होवो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविक कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी सक्सेना यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोस्ट तिकीटाचे व स्मरणिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन कल्पना पांडे यांनी तर महासचिव एस. रामाकृष्ण यांनी आभार मानले.
1,716 total views, 3 views today