नागपूर /:-महाराष्ट्रात आर्थिक अडचणीत आलेले कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत . एकीकडे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान प्रति क्विंटल दिले जाते मात्र कापसाचे भाव १४ हजार रुपयेवरून ७ हजार रुपये प्रति क्विंटल आल्यानंतरही केंद्र सरकार व राज्य सरकारने महाराष्ट्रातील ८० लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे या शेतकऱ्यांच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या 18 मे रोजी पांढरकवडा येथे कापूस होळी आंदोलन केले जाणार आहे. विदर्भाच्या शेतकरी विधवांनी सरकारच्या दुर्लक्षित धोरणाविरुद्ध तहसील चौकातील भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संध्याकाळी ५ वाजता या आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आज विदर्भ शेतकरी विधवा संघटनेचे अपर्णा मालीकर ,भारती पवार ,रेखा गुरनुले ,कविता सिडाम यांनी दिली
या आंदोलनात आपले सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेऊन काँग्रेस ,शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,भारत राष्ट्र समितीचे नेते सहभागी होणार असून शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस उत्पादक शेतकरी कापसाची सांकेतीक होळी करून आपला रोष प्रगट करणार आहेत तरी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केले आहे.
“ज्या प्रमाणे सरकारने कांद्यासह इतर पिकास प्रति क्विंटल अनुदान दिले त्या प्रमाणे शेतकऱ्यांनी विकलेल्या कापसाला प्रति क्विंटल ५ हजार रुपये अनुदान द्यावे ,कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे ह्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. आज महाराष्ट्रातील ८० लाख कापूस उत्पादक शेतकरी वाचविण्यासाठी शिंदे सरकारला झोपेतुन जागविण्याची वेळ आली आहे ” अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी यावेळी दिली. यापूर्वी हे आंदोलन ३ मे रोजी आयोजित करण्यात आले होते मात्र अवकाळी पाऊसाने हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले. आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन शेतकरी आंदोलनाचे संयोजक अंकित नैताम ,मोहन मामीडवार ,विजय तेलंगे ,मोरेश्वर वातीले ,प्रेम चव्हाण ,अजय राजूरकर ,रोहन ठाकरे ,सुनील राऊत,बाळासाहेब जाधव ,रमेश चव्हाण यांनी केले आहे .