चंद्रपूर 22 मे – सावली वनपरिक्षेत्रातील समदा नियतक्षेत्रालगत शेतशिवारात हल्ला झालेल्या परिसरात मादी बिबट पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे समोर आले आहे. तिच्या २ पिल्लांना आधीच वनविभागाने पकडले होते. दरम्यान या भागात हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी शोध मोहीम जारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपक्षेत्राच्या समदा नियतक्षेत्रालगत असलेल्या शेतात प्रेमीला रोहणकर (५५) ही महिला सकाळी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. तेव्हा प्रात:र्विधीसाठी शिवारातच जात असता त्यावेळी अचानक वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना शनिवारी घडली होती. हल्लेखोर वाघाने ३ जणांचे बळी या भागात घेतले असून त्या हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश २७ एप्रिललाच देण्यात आले आहेत. या हल्लेखोर वाघाला पकडण्याची तेव्हापासून ”आरआरयु” व ताडोबाचे ”एसटीपीएफ” चे पथक तैनात आहेत. पण पथकाला अजूनही यश आलेले नाही. शनिवारच्या घटनेनंतर हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याच्या मोहिमेस गती आली आहे. त्यातच शनिवारी सायंकाळी वनविभागाने २ बिबट पिल्लांना पकडले होते. गावालगत बिबट्याचा वावर बघता त्यांच्या आईलाही जेरबंद करणे गरजेचे होते. तेव्हा पिंजऱ्यात २ पिल्लांना ठेवण्यात आले होते. त्यावेळी तेथे आलेल्या मादी बिबट्या अलगतपणे रात्री हल्ला झालेल्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती सूत्रांनी हिंदुस्थान समाचारशी बोलताना दिली.