
मुंबई MUMBAI -राज्यात यंदा पावसाचे प्रमाणच बरेच कमी राहिले आणि अनेक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पावसाची प्रतीक्षा सुरु आहे. (Maharashtra Rain) सप्टेंबर महिन्यातही पाऊस पडणार की नाही, हे स्पष्ट नसताना आता हवामान विभागाने मान्सूच्या परतीच्या तारखांचेही अंदाज वर्तविले आहेत. ५ किंवा ८ ऑक्टोबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यात सरासरी केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. १५ जिल्ह्यांमधील सरासरी पावसात मोठी तूट आहे. जून महिन्यात अत्यल्प पाऊस पडल्यावर जुलै महिन्यात पावसाने राज्याच्या बहुतांशी भागात दमदार हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाचा खंड पडला. बऱ्याच जिल्ह्यांत ऑगस्ट महिना कोरडा गेल्याचे चित्र आहे. पूर्व विदर्भातही पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला तरी तुलनेने परिस्थिती वाईट नाही. मात्र, अनेक जिल्ह्यांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शेतातील उभी पिके माना टाकू लागली आहे. मराठवाड्यात सर्वात विदारक परिस्थिती आहे. शेतकरी चिंतेत असताना त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. भारतीय हवामान विभागानं पाच किंवा आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
