
मुंबई MUMBAI –राज्यात यंदा पाऊस फारच कमी पडल्याने दुष्काळाचे संकेत मिळत आहेत. त्याची दखल घेत राज्य सरकारने मंत्रालयात दुष्काळ नियंत्रण वॉर रुम सुरु करण्याचा (War Room for Drought Situation) निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वॉर रुममधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या वॉररूमच्या माध्यमातून दुष्काळी भागांतील कामांना गती देण्याचे, अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवण्याचे काम होणार आहे.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. मागील महिनाभरात पावसाचे खंड दिल्याने उभी पिके करपण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. सप्टेंबर महिन्यातही पाऊस कधी व किती पडणार, याचे अंदाज अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकार सज्ज होत आहे. यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावर नियंत्रणासाठी विशेष अधिकारी नेमण्यात येणार असून राज्यातील पाणीसाठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. राज्य सरकारने नुकतेच धरणातील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते यानुसार उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापरासाठी आरक्षित केला जाणार आहे. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठ २०१५ मध्येही वॉर रुम सुरु केली होती. या वॅार रुमच्या माध्यमातून विकास प्रकल्पांचाही आढावा घेण्यात येत होता.
