
पुणे 3 सप्टेंबर : पीक कर्जाची Crop loan सहा टक्के व्याजाने मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासन प्रत्येकी तीन असे मिळून एकूण सहा टक्के व्याजाचा परतावा देणार होते. याला दोन वर्ष उलटून गेले. मात्र, व्याजाच्या परताव्याचा छदाम सुद्धा मिळाला नाही. आता मात्र दोन पैकी पहिल्या एका वर्षाच्या परंतु फक्त केंद्र शासनाच्या वाट्याच्या व्याजाचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण राज्याच्या वाट्याचा तीन टक्क्यांचा परतावा कधी मिळणार, असा सवाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.
सहकारी सोसायट्यांचे नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा केला जायचा. परंतु २०२१ पासून केंद्रशासनाने या धोरणात बदल केला. या बदलानुसार उचललेल्या पीक कर्जावर शेतकऱ्यांनी सहा टक्के व्याज भरायचे आणि शासन हे पैसे व्याजाचा परतावा म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा जमा करणार होते. शासनाने हा बदल केल्यानंतर शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत खरिपातील दोन व रब्बी हंगामातील दोन असे एकूण चार वेळच्या कर्जाची सहा टक्के व्याजाप्रमाणे परतफेड केली.
