
मुंबई- मराठा समाजाला कुणबीचा दाखला देण्याचा विचार करण्यासंबंधी एक समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. (CM Eknath Shinde on Maratha Reservation) ही समिती एका महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल. त्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शिंदे यांनी मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले चुकीचे गुन्हे मागे घेण्याचीही घोषणा केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्याशिवाय उपोषण मागे घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी नेमलेलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला येण्याचे आवाहन केले. अर्जुन खोतकर यांनी सांगितले, मराठा आरक्षणाचा जीआर कोर्टात टिकावा अशा पद्धतीने काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, त्याआधी परिपूर्ण चर्चा होण्याची आवश्यकता आहे. जरांगे पाटील यांनी आता उपोषण मागे घेऊन चर्चेची दारे उघडी करावीत. जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना उद्देशून अर्जुन खोतकर म्हणाले, जरांगे पाटील यांची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. कुणबी समाजाला दाखला देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.
