
नागपूर : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवायला सरकारला उशीरच झाला असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. सरकारला आता उपोषण सोडवणे आणि आंदोलन संपुष्टात आणणे एवढेच काम शिल्लक असल्याचा टोला त्यांनी लगावला. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “जी व्यक्ती समाजासाठी काम करते, त्याकडे सरकारने आधीच लक्ष द्यायला हवे होते. त्यामुळे सरकारने उपोषण सोडवले असले तरी त्यात उशीर झाला आहे. जशी उपोषण सोडवण्याची जबाबदारी सरकारची होती तशीच आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारीही सरकारची आहे आणि ती जबाबदारी सरकारने लवकर पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसी समाजालाही मुख्यमंत्र्यांनी विश्वास देण्याची आवश्यकता आहे. आम्ही मराठ्यांना सरसकट ओबीसीचे प्रमाणपत्र देणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाला सांगितले पाहिजे.