
अमरावती- राज्यात जादूटोणा विरोधी कायदा लागू होऊन दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाली आहेत. परंतु तरीही शासनाच्या वतीने या कायद्याविषयी जनजागृती होत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) च्या वतीने राज्यव्यापी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन या कायद्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. 90 दिवस ही यात्रा चालणार असून आतापर्यंत 13 जिल्ह्यातील 8 ते 9 हजार नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. आता अमरावतीमध्ये ही जनसंवाद यात्रा पोहचली आहे. यावेळी अनिसच्या राज्य कार्यकारणी सदस्या नंदिनी जाधव, प्रशांत पोदार, भगवान रणदिवे यांनी सामाजिक न्याय भवन कार्यालय जवळ असलेल्या भीमशक्ती नगर या झोपडपट्टी मध्ये जाऊन जादूटोणा विरोधी कायद्याविषयी जनजागृती केली. यावेळी नागरिकांना बुवाबाजी व कशाप्रकारे लोकांची जादूटोणा करून फसवणूक केली जाते या विषयी माहिती दिली. दोन दिवस ही समिती जिह्यातील विविध भागांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहे.