
अमरावती- राज्यभरात कालपासून लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. अशातच, कॉंग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केला आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी काँग्रेसचेच सरकार स्थापन झालेलं असेल, तर राज्यात सुरू आहे तो वेडेपणा आहे. 99 टक्के सत्ताधारी राजकारण करीत आहेत,आम्ही समाजकारणाच्या जवळ आहोत, असा दावा माजी मंत्री ,काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर कारवाई करण्यात आली, यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला. हा सत्ताकारणासाठी गोंधळ आहे. रोहित पवार ऍक्टिव्ह झाले आहेत, स्वतः रोहित पवार हे सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या सोबत महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर आणण्यासाठी भाजपचे हे काम असेल किंवा त्यांच्या परिवारातील असेल अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.