
मुंबई- भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील काही आमदार नाराज आहेत, तर काही आमदार थेट भाजपमध्ये जाण्याच्या विचारात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (NCP Leader Rohit Pawar)
रोहित पवार यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केलाय. अजित पवार गटाने विकास निधी वाटपात न्याय मिळत नसल्याने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तरी ते नाराज आहेत हे जाणवते. पण, नाराजी वेगवेगळ्या कारणांवर असू शकते. दुसऱ्या नेत्यांना पक्षात आणून त्यांची ताकद कमी करायची ही भाजपची प्रथा आहे. तीच गोष्ट अजित पवार यांच्याबाबतील भाजपने केली असल्याचे आमच्या सर्वांचे मत असल्याचे ते म्हणाले. भाजपकडून दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. लोकसभेपुरते नाराज आमदारांना वापरतील, सुरूवातीला नेत्यांना, लोकांना आमिष दाखवतील पण खरी वेळ आल्यावर काहीच करायचे नाही, अशीच वागणूक भाजप देत असल्याचे ते म्हणाले.