कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांचे आज चक्का जाम आंदोलन
नवी दिल्ली |
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर दोन महिन्यांपक्षाही जास्त दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत अद्याप कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार, ६ फेब्रवारीला देशभरात चक्का जाम आंदोलन केल जाणार आहे. मात्र, दिल्लीसह उत्तर प्रदेश व उत्तराखंड येथे उद्या चक्का जाम होणार नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगतिले आहे. टिकैत म्हणाले, हा चक्का जाम दिल्लीत होणार नाही. जे लोकं इथे येऊ शकले नाहीत, ते आपआपल्या ठिकाणी शांततेत चक्का जाम करतील, शेतकरी नेत्यांकडून राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना राकेश टिकैत म्हणाले, यावेळीचा चक्का जाम केवळ तीन तास (दुपारी १२ ते ३ ) या वेळेत होईल. या काळात शेतकरी आपआपल्या भागांमधील रस्ते जाम करतील आणि रस्त्यांवर बसून विरोध दर्शवतील. तीन तासानंतर आंदोलकांकडून गाव, ब्लॉक, जिल्हास्तरावर स्थानिक अधिकार्यांना निवेदन दिले जाईल. तर दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की, चक्का जामबाबत आमच्याशी कोणत्याही नेत्याने संपर्क साधलेला नाही. मात्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणामधील पोलीस याबाबत अधिक गंभीर आहेत. |