दिल्ली हिंसाचार : फरार दीप सिद्धूला अटक
नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी: प्रजासत्ताक दिनी झालेल्या दिल्ली हिंसाचार प्रकरणी अखेर पोलिसांनी फरार अभिना दीप सिद्धूला अटक केलीय. शेतकरी आंदोलकांना भडकावणे, लाल किल्ल्यावर घेऊन जाणे आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा त्याच्यावर आरोप असून गेल्या 14 दिवसांपासून तो फरार होता. त्याला हरियाणातील कर्नाल येथून अटक करण्यात आलीय.
प्रजासत्ताक दिनी नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण साहिब धार्मिक ध्वज फडकावला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अभिनेता दीप सिद्धू याचं नाव समोर आले होते. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला होता. त्याचबरोबर दीप सिद्धूला अटक करण्याची मागणीही सातत्याने केली जात होती. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धूने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता.
“दीप सिद्धूने शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, असे शेतकरी नेते गुरनाम सिंह चाडूनी यांनी घटनेनंतर म्हटले होते. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवले होते. राजकीय पक्षांकडूनही दीप सिद्धूला अटक करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. वारंवार सिद्धूच्या अटकेची मागणी केली जात असताना अखेर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केलीय.