जळगाव : मानवी हक्काची जाणीव शेवटच्या घटकापर्यंत असणे आवश्यक – जिल्हाधिकारी
जळगाव, : भारतीय घटनेने भारतीय नागरिकांना मुलभूत अधिकारापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी १० डिसेंबर १९४८ रोजी मानवी हक्क आयोगाची स्थापना करून त्या दिवसापासून १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मानवी हक्काची जाणीव असणे आवश्यक असून प्रत्येक नागरिकाला हक्क प्रदान करीत असताना प्रत्येकाने कर्तव्याचीही जाण ठेवणे तीतकेच आवश्यक असल्याचे अभिप्रित असून प्रशासनातील सर्व घटकांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मानवी हक्काचे महत्व पटवून देतानाच कर्तव्याचेही महत्व सांगावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या सभादालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सर्व संबंधितांना केले.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत पुढे म्हाणाले की, जेव्हा नागरिक आपल्याकडे काही काम घेवून येतात तेव्हा त्यांना आपले काम विनाविलंब व्हावे अशी अपेक्षा असते तेव्हा आपणही तितक्याच तत्परतेने न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. शक्यतो नागरिकांना प्रत्येक कामासाठी जिल्हास्थारावर येण्याची आवश्यकता भासणार नाही याची काळजी घेत त्यांच्या कामांचा गाव पातळीवरच निपटारा केल्यास त्यांना खर्या अर्थाने न्याय मिळाल्याचे समाधान मिळून मानवी हक्काचा लाभ दिला असे म्हणता येईल, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यावेळी सांगितले.कोरोनाच्या काळात कोरोना बाधित आणि संबंधित यंत्रणांना प्रशासनाकडून मानवी हक्काचा लाभ देण्यात आल्याने बाधितांना औषधोपचाराबरोबच माणूसकीचेही दर्शन लाभले भविष्यातही या सर्वांना मानवी दृष्टीकोनातून मानवी हक्क मिळवून देण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व संबंधितांना केले.