खंडणीबहाद्दरांना ‘समर्पण’ कळणार नाही : फडणवीस Ransom will not be known as ‘surrender’: Fadnavis
मुंबई : अयोध्येत भव्य राममंदिराची उभारणी व्हावी म्हणून देशातील प्रत्येक व्यक्ती समर्पण करीत आहे. परंतु खंडणीबहाद्दरांना ‘समर्पण’भाव कधीच कळणार नाही असा प्रहार माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे भाषण पूर्णपणे दिशाहीन आहे. राम मंदिराच्या बाबतीत बोलताना समर्पण या शब्दाचा अर्थ काय असतो हे बोलणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळातील भाषणात भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळाले नाही, असे सांगताना सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्यांसोबत आपण खुर्ची वाटून बसलोय याचा विसर पडल्याचे फडणवीस म्हणाले. अशांना सावरकरप्रेम कधीच कळणार नाही. स्वातंत्र्य लढ्यात शिवसेना कधीच नव्हती हे स्वत: सांगून मुख्यमंत्र्यांनी बरे केले. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे स्वत: एक स्वातंत्र्यसैनिक होते, याचे ज्ञान त्यांना कदाचित नसावे, असा टोलाही त्यांनी लगावला. खरे तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून महाराष्ट्राला ठोस काही तरी अपेक्षित होते. मात्र दिशाहीन भाषणातून राज्यातील नागरिकांची निराशा झाल्याबद्दल खेद वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.