कोरोना लस घेतल्यावर निर्धास्तपणे फिरता येणार?; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती Will the corona be able to move freely after vaccination ?; Important information given by Rajesh Tope
जालना: कोरोना लसीकरणासाठी राज्य सज्ज असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपासून राज्यात लसीकरणाच्या ड्राय रनला सुरुवात झाली. त्याची पाहणी करण्यासाठी टोपे जालन्यातील ड्राय रन सुरू असलेल्या केंद्रावर आले होते. सीरमनं तयार केलेली लस देण्यासाठी राज्य तयार असून त्यासाठी ड्रग अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची गरज आहे. ही परवानगी मिळाल्यास प्रशासन लसीकरणासाठी सज्ज असल्याचं टोपे यांनी सांगितलं. लसीकरण केंद्राची रचना मतदान केंद्रासारखीच असेल, अशी माहिती टोपेंनी दिली. ‘आपण मतदान करण्यासाठी केंद्रावर जातो, त्यावेळी तिथे आपली पहिली भेट पोलीस कर्मचाऱ्यांशी होते. लसीकरण केंद्रावरदेखील पोलीस असतील. ते ओळखपत्र तपासतील. लसीकरण केंद्रात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य असेल. त्याशिवाय केंद्रात प्रवेश करता येणार नाही. पोलिसांना ओळखपत्र दाखवल्यानंतर संबंधित व्यक्ती आयडेंडिफिकेशन रुममध्ये जाईल. तिथे शिक्षक किंवा शिक्षिका असतील. ज्यांना लसीकरणासाठी मेसेज पाठवण्यात आला आहे, तीच व्यक्ती केंद्रावर आली आहे का, याची पडताळणी शिक्षक शिक्षिकेकडून कोविन ऍपच्या माध्यमातून केली जाईल,’ असं टोपे म्हणाले.
पडताळणी झाल्यानंतर लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन किंवा तीन प्रशिक्षित नर्स असतील. त्या ठराविक तापमानात ठेवण्यात आलेली लस संबंधित व्यक्तीच्या दंडाला टोचतील. त्यानंतर त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवलं जाईल. काही व्यक्तींना ताण-तणावाची समस्या असते. काही जण लगेच अस्वस्थ होतात. त्यामुळे त्यांना भोवळ येऊ शकते. असा काही प्रकार घडल्यास लसीकरण केंद्रावर बेड, ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा उपलब्ध असेल. लसीकरण झालेल्या व्यक्तीचं निरीक्षण करण्याचं काम आशा वर्कर्स, अंगणवाडीत काम करणाऱ्या महिला करतील, अशी माहिती टोपेंनी दिली. कोरोनाची लस घेतल्यानंतर बिनधास्त फिरता येईल, असा अनेकांचा समज झालेला आहे. याबद्दलची शंकादेखील टोपेंनी दूर केली. कोरोनाची लस घेतली की निर्धास्तपणे फिरायला मोकळे, असं अनेकांना वाटू लागलं आहे. पण कोरोनाची लस घेतल्यावर शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियम पाळणं गरजेचं आहे, असं टोपे म्हणाले.