आसाम : मुसळधार पावसामुळे 142 गावे पाण्याखाली

0
37

गुवाहटी, 20 जून (हिं.स.) : मुसळधार पावसामुळे आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून 30 हजार लोकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे. राज्यातील 142 गावे पाण्याखाली गेली असून 1510.98 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

हवामान विभागाने (आयएमडी) आसामसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारपर्यंत (22 जून) अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीच्या गुवाहाटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी) कोकराझार, चिरांग, बक्सा, बारपेटा आणि बोंगाईगाव जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाच्या अंदाजासह ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. याच कालावधीत धुबरी, कामरूप, कामरूप महानगर, नलबारी, दिमा हासाओ, कछार, गोलपारा आणि करीमगंज जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (एएसडीएमए) दैनंदिन पूर अहवालानुसार, कचार, दररंग, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, होजई, लखीमपूर, नागाव, नलबारी, सोनितपूर, तिनसुकिया आणि उदलगुरी येथे पुरामुळं 33 हजार 400 हून अधिक लोकांना फटका बसला आहे. या जिल्ह्यांमध्ये 16 मदत वितरण केंद्रे चालवण्याव्यतिरिक्त, प्रशासन एक मदत शिबिर चालवत आहे. जिथे 9 लोकांनी आश्रय घेतला आहे. एएसडीएमएने दिलेल्या माहितीनुसार सध्या 142 गावे पाण्याखाली आहेत. तर आसाममधील 1,510.98 हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

दिमा हासाओ आणि करीमगंजमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्याचवेळी सोनितपूर, लखीमपूर, उदलगुरी, चिरांग, दिब्रुगढ, कामरूप, कार्बी आंगलाँग, करीमगंज, बोंगाईगाव, माजुली, मोरीगाव, शिवसागर आणि दक्षिण सलमारा येथे बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. नेमातीघाट येथील ब्रह्मपुत्रा, एनएच रोड क्रॉसिंग येथील पुथिमारी आणि कांपूरमधील कोपिली नदी धोक्याच्या चिन्हावरून वाहत असल्याचे अहवालात म्हंटले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा