
अकोला- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना संघटनेच्या शिस्तपालन समितीने 15 ऑगस्टपर्यंत समिती समोर उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यासाठीचा अवधी दिला होता. रविकांत तुपकर यांनी समिती समोर प्रत्यक्ष हजर झाले नसले, तरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना त्यांनी सविस्तर असे पत्र लिहले आहे. या पत्राच्या माध्यमातून आपल्या व्यथा, आक्षेप त्यांनी सविस्तरपणे व्यक्त केल्या आहेत. शिवाय शिस्तपालन समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांनाही त्यांनी पाठविले असल्याचे कळते. राजू शेट्टी यांना आपण 4 – 5 वर्षांपासून आपले म्हणणे वारंवार सांगत आलेलो आहे. शिवाय शिस्तपालन समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशीही यापूर्वी फोनवरून सविस्तर चर्चा झालेली आहे. वारंवार तेच ते म्हणणे किती वेळा मांडू ? असे रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना दिलेल्या पत्रात अगदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील सर्व घडामोडींचा व संघटनेच्या कार्याचा उल्लेख आहे. शिवाय संघटनेची विविध आंदोलने, तुपकरांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार, तडीपारी, तुरुंगवास असा एकंदरीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चळवळीचा आणि राजकीय प्रवास या बद्दल पत्रात उल्लेख असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना या पत्रातून मांडण्यात आल्याचे समजते. प्रत्येक निवडणुकीत राजू शेट्टी यांची बदलती राजकिय भूमिका आणि त्याचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेला परिणाम, संघटनेच्या कार्यपद्धतीवर असलेला आक्षेप यासह इतर बाबी पत्रात नमूद असल्याचे कळते. तर शेतकऱ्यांसाठी हा चळवळीचा लढा अधिक जोमाने पुढे न्यायचा आहे असे रविकांत तुपकर यानिमित्ताने म्हाणाले. मात्र,नेमके कोणते आक्षेप तुपकरांनी या पत्रात मांडले, हे कऴू शकले नाही. 9 ते 10 पानांच्या या पत्रात तुपकरांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि व्यथा नमूद केल्याचे कळते. आता याबाबत राजू शेट्टी व शिस्तपालन समिती काय भूमिका घेते? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
