
नागपूर : उद्याही निवडणुका झाल्या तरी महायुतीची तयारी आहे, २०२४ पर्यंत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मन आणि मतपरिवर्तन झालेले दिसेल. असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विदर्भातून 20 ऑगस्टला त्यांच्या लोकसभा प्रवासाचा शुभारंभ होत आहे.
नागपुरात त्यांनी पत्रकारांना सांगितले, जसजसे दिवस २०२४ कडे जातील तशी ५१ टक्के मते भाजपा व महायुतीला मिळतील व निवडणुकीत मताची टक्केवारी वाढेल. नेत्याचा ओघही भाजपाकडे येईल, त्यांना समावून घेण्याची क्षमता भाजपात आहे.
आमदाराच्या घरात आमदार व खासदाराच्या घरात खासदार व्हावा ही संस्कृती योग्य नाही. कर्तृत्वशून्य असताना त्यास आमदार करावे हा आग्रह असतो तो मोडून काढण्यासाठी मोदीजींनी लोकशाहीला पोषक असे अनेक निर्णय घेतले. प्रत्येक जिल्ह्यात एक महिला महामंत्री असावी, युवकांना संधी मिळावी जेणेकरून युवक राजकारणात येऊन तर तो देशाकरिता राजकारणात काम करेल. मी आणि माझा मुलगा ही उद्धव ठाकरे याचा मी मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा मंत्री या ज्या सवयी आहेत या सवयी बंद व्हाव्यात यासाठी मोदीजींनी हा आदर्श समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे यावर बावनकुळे यांनी भर दिला.
मतदार जेव्हा मताचे कर्ज देतात तेव्हा ते कर्ज कामे करून विकास करून जे परत करतील त्यांनाच देतात, त्यामुळे निवडणुकीत मते मोदींनाच मिळणार असेही बावनकुळे म्हणाले :
दरम्यान, आमदार बच्चू कडू यांना स्वबळाची तयारी करण्याचा अधिकार असून ते एनडीएमध्ये आहेत. त्याचा सन्मान व समाधान करण्यासाठी चर्चा केली जाईल. विरोधकांनी आज रान उठविले असले तरी कॅगचा रिपोर्ट हा कधीच अंतिम नसतो, त्यावर सरकार स्पष्टीकरण देते, सरकारचे योग्य स्पष्टिकरण झाल्यास तो रिपोर्ट सुधारित केला जातो.
