नागपुरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे 2 महिलांचा मृत्यू

0

शहरातील सुमारे 400 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

दिवसभराच्या अविश्रांत प्रयत्नानंतर परिस्थिती पूर्वपदावर

नागपूर, 23 सप्टेंबर  : नागपुरात मध्यरात्री 2 ते पहाटे 5 वाजेदरम्यान झालेल्या ढगफुटीसदृश्य परिस्थितीमुळे आतापर्यंत 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जनावरे दगावली आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या सतर्कतेने एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्य आणि स्थानिकांच्या मदतीने दुपारपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली आहे.

नागपुरात शनिवारी पहाटे 2 वाजता अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला विजांच्या कडकडाटासह अवघ्या 4 तासात 109 मिलीमीटर पाऊस कोसळला. यातील पहिल्या 2 तासांमध्ये 90 मि.मी.पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अंबाझरी तलावातील पाण्याचा ओव्हर फ्लो होवून हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. तसेच नदी काठावरील घरांमध्ये पाणी घुसले. अंबाझरी आणि वर्मा ले-आऊट तसेच शंकरनगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी वस्त्यांमध्ये शिरले. या परिस्थितीचा सामना करण्याकरिता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने पावले उचलली. शहरात तत्काळ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) आणि लष्करांचे प्रत्येकी 2 दल दाखल झाले व बचावकार्य सुरु झाले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी नागपुरसह जिल्हयातील शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. बचाव कार्यादरम्यान शंकरनगर भागातील मुक व कर्णबधिर शाळेच्या तसेच एलईडी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासोबतच शहराच्या सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांनाही बाहेर काढण्यात आले. शहरातील सुमार 400 नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून प्रशासनाने तयार केलेल्या निवारा केंद्रात त्यांना पाठविण्यात आले.

या सर्व घटनाक्रमात घरात पावसाचे पाणी शिरल्याने महेशनगर परिसरातील मिराबाई पिल्ले (70 वर्षे) आणि तेलंगखडी परिसरातील सुरेंन्द्रगड येथील संध्या डोरे (80 वर्षे) यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी पहाटे 5 पासून प्रत्यक्ष घटनास्थळाला भेटी देऊन बचाव कार्याचे नियंत्रण केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही महापालिका कार्यालयातील वार रुममधून परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील हजारीपहाड भागात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. या भागात गोठ्यात बांधलेली 14 जनावरे (सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरे) मृत झाली आहेत. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल घोघल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा तत्काळ पंचनामा करण्याचे व आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. नंदनवन परिसरतील स्वातंत्र्य गल्ली क्र.4 व 6 झोपडपट्टी भागासही जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आमदार अभिजित वंजारी उपस्थित होते. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे. प्रशासनाच्यावतीने कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातुन सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, धोकादायक घरातील नागरीकांना घरातुन सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सक्करदरा गार्डन, मोरभवन बसस्थानकामध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा