
(Nagpur)नागपूर : चहा-बिस्कीट वेळेत न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरने कमालच केली. शस्त्रक्रिया सोडून तो आरोग्य केंद्रातून निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकारावर संताप व्यक्त होत आहे. (ZP Primary Health Center Incidence)
हा प्रकार जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नोव्हेंबर रोजी घडला. डॉ. तेजराम भलावे असे या डॉक्टरचे नाव आहे. खात येथील केंद्रात ते कुटुंबनियोजनासाठी आठ महिलांवर शस्त्रक्रिया करणार होते. यातील चार महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली. पुढे अन्य चार महिलांना त्यांनी भूलसुद्धा देण्यात आली होती. पण, त्यांना वेळेत चहा बिस्कीट मिळालं नाही. यावर डॉक्टरांना राग अनावर झाला आणि ते आरोग्य केंद्रातून तडकाफडकी निघून गेले. डॉक्टरांच्या कृत्याचा नाहक त्रास चारही महिला रुग्णांना सहन करावा लागला कारण त्यांना भूल देण्यात आली होती. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चार महिला तशाच ताटकळत राहिल्या. या प्रकारावर संबंधित महिलांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठांनी दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था केली.

या प्रकरणाची बोंबाबोंब झाल्यावर डॉक्टरने वेगळीच भूमिका घेतली. आपल्याला मधुमेह असून आपल्याला वेळेवर चहा बिस्किटे लागतात. ती न मिळाल्याने आपल्या रक्तशर्कराचे स्तर खालावले व आपला रक्तदाबही खालावला. त्यामुळे आपल्याला तेथून काढता पाय घ्यावा लागल्याचे स्पष्टीकरण डॉ. भलावी यांनी आपल्या वरिष्ठांना दिल्याचे कळते. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांची चौकशीचे आदेश दिले आहेत.