
नागपूर : द्रृष्टी परिवार असोसिएशन फॉर ब्लाइंड पिपल संस्थेतर्फे समाजकार्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा आणि व्यक्तींचा गौरव सोहळा नुकताच बोरीवली, मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यात आद्यब्रह्मवादिनी फाउंडेशन या संस्थेला “उत्कृष्ट सामाजिक संस्था” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका डॉ. वृषाली शिलेदार आणि सहसंस्थापिका डॉ. योगिता कस्तुरे तसेच ठाणे संस्थापिका अपर्णा मार्डीकर ,अंजली भालेराव निकीता वैद्य तसेच मुंबईच्या संघटिका गिता वैद्य , अनुश्री पाठक आणि त्यासोबत कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. द्रृष्टी परिवार असोसिएशन चे अध्यक्ष ज्ञानेश जोशी, भरत जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेने महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, सामाजिक जनजागृती यांसोबतच संस्कार, संस्कृती आणि पारंपरिक सणांचे जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्राधान्य दिले आहे. याशिवाय, संस्थेमार्फत महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणे, व्यासपीठ उपलब्ध करून देणे, व्यवसाय मार्गदर्शन तसेच त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हेही महत्त्वाचे कार्य केले जात आहे. राष्ट्रसेविका समितीच्या आदरणीय संस्थापिका मावशी केळकरांचा नाट्यमय जीवन परिचय करून देणारे कार्यक्रम महाराष्ट्रात आठ जिल्ह्यांमध्ये प्रस्तुत करण्यात आले
तसेच ही संस्था पाच राज्यात आणि ३६ जिल्ह्यांमध्ये ३५००० च्या वर कार्यकर्त्यांसह कार्यरत आहे.
विविध उपक्रम, कार्यशाळा आणि प्रशिक्षणांच्या माध्यमातून संस्थेने समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. या पुरस्कार सोहळ्यास विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी हा सन्मान संपूर्ण टीमच्या परिश्रमाचे फलित असल्याचे सांगितले. संस्थेच्या वतीने भविष्यातही समाजहितासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी अधिक जोमाने कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.














