Home Artical Blog नागपुरात एसएनजी प्रकल्प मुख्यालय स्थापनेच्या मागणीला वेग

नागपुरात एसएनजी प्रकल्प मुख्यालय स्थापनेच्या मागणीला वेग

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कोल इंडिया लिमिटेड व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र

नागपूर(Nagpur): विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी कार्यरत असलेल्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) या संस्थेने आगामी सिंथेटिक नॅचरल गॅस (एसएनजी) प्रकल्पाचे मुख्यालय नागपुरात स्थापन करण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत.

एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे यांनी अलीकडेच नागपुरात मुख्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने शहराचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करणारे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोल इंडिया लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले आहे.

कोल गॅसिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारित एसएनजी उत्पादन प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील माजरी येथे प्रस्तावित आहे. कोल इंडिया लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जाणारा हा प्रकल्प सुमारे ₹१२,२१५ कोटींच्या गुंतवणुकीचा असून यामुळे सुमारे ३,००० कुशल व अर्धकुशल व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार आहे. यामुळे या परिसराच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

एआयडीने नमूद केले आहे की, प्रकल्पाचे मुख्यालय मुंबईत स्थापन करण्याचा प्रस्ताव असला तरी प्रकल्प स्थळाजवळील निकटता आणि वेगाने विकसित होत असलेली औद्योगिक पायाभूत सुविधा लक्षात घेता नागपूर हा अधिक योग्य आणि धोरणात्मक पर्याय ठरेल. नागपुरात मुख्यालय स्थापन केल्यास कार्यक्षमता वाढेल, समन्वय अधिक सुलभ होईल आणि विदर्भातील संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळेल.

संबंधित प्राधिकरणांनी प्रादेशिक विकास आणि औद्योगिक विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने सकारात्मक व व्यावहारिक निर्णय घेतील, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.