एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, सीमा प्रश्नावर फडणवीसांचे नागपुरात स्पष्टीकरण

0

नागपूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील ४० गावांसंदर्भात दावा केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यामुळे राज्यातील राजकारण तापले असून कर्नटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, अशी स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढून सीमाभागातील कारवार, बेळगाव, निपाणी ही गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु, असे फडणवीस यांनी यावेळी सांगिले. आपण एकाच देशात राहतो. त्यामुळे हा शत्रुत्त्वाचा नव्हे तर कायदेशीर वाद असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी एक बैठक घेऊन सीमाभागातील मराठी बांधवांना कायदेशीर मदत करण्याचा निर्णय घेतला होता. सीमाभागातील बांधवांना नव्या योजना आणि सुविधांचे लाभ देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आपणही काहीतरी करावे, या उद्देशाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांचा कर्नाटकात समावेश करण्याविषयीचे वक्तव्य केले असावे, असे फडणवीस म्हणाले.

त्या गावांचा ठराव

जत तालुक्यातील ४० दुष्काळी गावांनी २०१२ साली कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव आत्ताचा नाही. मी मुख्यमंत्री असताना या गावांना पाणी मिळवून दिले. या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही म्हैसाळ सुधारित योजनेत या गावांचा समावेश करण्यास मान्यता दिली होती. मात्र, नंतरच्या काळात कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला असावा. आता आम्ही म्हैसाळ प्रकल्पाला तातडीने मंजुरी देणार आहोत. या योजनांसाठी केंद्र सरकार पैसा देणार असल्याने निधीची अडचण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भाजपला महाराष्ट्र तोडायचाय-राऊत

कर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्त्वाखालील मिंधे सरकार आहे. यापैकी कोणाला मुंबई तोडायची आहे. कोणाला महाराष्ट्रातील जिल्हे आणि गावे तोडायची आहेत. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
सध्या राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्यास धजावले, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा