राज्यपालांविरुद्ध खासदार उदयनराजेंची आक्रमक भूमिका, ३ डिसेंबरला घेणार जनाक्रोश मेळावा

0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale ) येत्या ३ डिसेंबरला जनाक्रोश मेळावा घेणार आहेत. यासंदर्भात राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना ३ डिसेंबरनंतर भेटून याबाबत गाऱ्हाणे मांडणार असल्याचे उदयनराजे यांनी जाहीर केले. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यातील विविध शिवप्रेमी संघटनांची खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदयनराजे भोसले म्हणाले, सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष सभा समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात. त्यांच्या विचारांना आदर्श मानतात. मात्र दुसरीकडे महाराजांच्याबद्दल लेखन, चित्रपट आणि वक्तव्यातून अवहेलना होत असताना कुणाला कसा राग येत नाही. तुमच्या राजकीय पक्षांचा अजेंडा वेगळा असेल मग महाराजांचे नाव का घेता? असा उद्विग्न सवाल देखील भोसले यांनी राजकीय पक्षांना केला आहे. प्रत्येकजण राजकारण करणार असेल, बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई होणार नसेल तर त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. शासनाच्या वतीने महाराजांचा इतिहास अधिकृतपणे अद्यापही मांडण्यात आलेला नाही. तो मांडायला हवा. भाजपचे नाव न घेता राज्यपालांवर कारवाई करणार नसाल तर महाराजांचे नाव घेऊ नका, या शब्दांत त्यांनी भाजपला इशारा दिला. राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी करत, या प्रकरणाची दखल घेतली नाही तर निवडणुकीमध्ये जनता दखल घेईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा