हनुमान चालिसा प्रकरण-राणा दाम्पत्याविरुद्ध अटक वॉरंट

0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana and Navneet Rana) यांच्या नावे पुन्हा नव्याने वॉरंट जारी करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयात न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुरू असलेल्या या खटल्यास आरोपी सतत तीन सुनावणीत गैरहजर राहिल्याने अखेर कोर्टाने ही कारवाई केली आहे. तथापि, हा जामीनपात्र वॉरंट असल्याने दोघांनाही जामीन मिळू शकतो. मात्र, राणा दांपत्य गैरहजर राहिल्यास त्यांच्याविरोधात न्यायालय अजामीनपात्र वॉरंट काढून अटकेच्या कारवाईचे आदेश देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.


महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठणाचे आंदोलन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांनी पुकारले होते. त्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दांपत्याला कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवण्याच्या कारणाखाली मुंबई पोलिसांनी हे आंदोलन न करण्याबाबत सीआरपीसी कलम 192 अंतर्गत नोटीस बजावली होती. मात्र तरीही त्यांनी भूमिका न बदलल्याने व प्रक्षोभक वक्तव्य केल्याने राणा दांपत्याविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 153A, 34,37 सह मुंबई पोलीस कायदा 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यातच नंतर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही वाढवण्यात आला. 23 एप्रिल, शनिवारी आंदोलनाच्या दिवशी संध्याकाळी या प्रकरणात राणा दांपत्याला खार पोलीसांनी अटक करून रविवारी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानुसार राणांची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढे मुंबई सत्र न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला होता.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा