मंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी!

0

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यांमुळे वाद सुरु असताना त्यात आणखी एका वादाची भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली (Controversial statement by Minister Mangal Prabhat Lodha) आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप नोंदवला असून या प्रकरणावरुन आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह (CM Eknath Shinde) पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या भाषणात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने शिवरायांना रोखले, पण शिवाजीराजे त्याच्या हातावर तुरी देऊन निसटले. शिंदेनाही रोखण्याचा प्रयत्न झाला. पण शिंदेही महाराष्ट्रासाठी बाहेर पडले. प्रतापगड किल्ल्यावर शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला.


काय म्हणाले लोढा


लोढा यांनी यावेळी महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी तर शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या अग्र्यातील सुटकेशी केली. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी बाहेर पडले, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यात आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण तापले आहे. अशातच आता लोढा यांनी केलेलं वक्तव्य राज्यात नव्या वादाचं कारण ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या वादावर लोढा यांच्याकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.