ऐतिहासिक रामाळा तलाव संवर्धनाच्या कामाला गती द्यावी; इको-प्रोची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

0

दुसऱ्या टप्प्याचे नियोजन करून रामाळा तलाव उद्यान’ चे सौंदर्यीकरण आराखडा तयार करावे

चंद्रपूर(Chandrapur): शहराचा प्राचीन वारसा आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या कामाला त्वरित गती देण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात रामाळा तलाव संवर्धनाच्या मागणी करिता संस्थेने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते, ज्यानंतर प्रशासनातर्फे तलाव संवर्धनाच्या कामास सुरुवात झाली होती.

रामाळा तलाव संवर्धनाचा पहिला टप्पा: कामाचा दर्जा आणि गती राखणे आवश्यक
इको-प्रो संस्थेने निवेदनात नमूद केले आहे की, जनआंदोलनाची दखल घेत रामाळा तलावाच्या संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मंजूर होऊन सुरूवात झाली आहेत. यामध्ये एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) आणि रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधकामाचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या या कामांना आता पावसाळ्यानंतर तातडीने गती देणे आणि कामाचा दर्जा राखणे अत्यंत आवश्यक आहे. या कामाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना योग्य निर्देश देण्याची मागणी संस्थेने केली आहे.

रामाळा तलाव संवर्धन दुसरा टप्पा – रामाळा उद्यानाचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर रामाळा उद्यानाचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा दुसरा टप्पाचे नियोजन करणे त्वरित सुरू करण्याची आवश्यकता इको-प्रोने व्यक्त केली आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागातील हे उद्यान अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून, येथील सुविधांची संरचना खंडहर स्वरूपात असल्याने नागरिकांसाठी ते निरुपयोगी ठरत आहे.
यासाठी इको-प्रोने खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या केल्या आहेत:

रामाळा उद्यान सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आणि आराखडा
रामाळा उद्यान सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या प्रशासनाच्या नियोजनाला गती देण्यासाठी आणि सुधारित आराखडा त्वरित तयार करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत.

फुट ब्रिज बांधकाम
रामाळा तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस उद्यानात जाण्यासाठी मंजूर असलेल्या फुट ब्रिजचे बांधकाम पुरातत्व विभागाशी समन्वय साधून आणि आवश्यक सुधारणा करून तातडीने सुरू करावे.

अतिक्रमण नियंत्रण आणि पर्यावरणीय उपाययोजना
तलावाचे दीर्घकाळ संवर्धन करण्यासाठी संस्थेने काही महत्त्वाच्या पर्यावरणीय आणि अतिक्रमण नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे:

मियावाकी वन – वृक्षारोपण
तलावाच्या उत्तरेकडील, पूर्वी तलावाचाच भाग असलेल्या मोकळ्या जागेचा वापर ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण करून ही जागा अतिक्रमणापासून वाचवावी. यावर मागील अनेक बैठकांमध्ये चर्चा झालेली होती, त्याचा पुढील नियोजनात समावेश करावा.

अतिक्रमण रोखण्यासाठी रिटेनिंग वॉल
तलावाच्या पूर्व दिशेस असलेल्या वस्तीकडून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी रिटेनिंग वॉलचे बांधकाम करावे.

मच्छी नाल्याचे बांधकाम
रामाळा तलावात येणारा मच्छी नाला झरपट नदीकडे वळविण्यासाठी नाला बांधकामाचा प्रस्ताव तयार करावा. या उपायामुळे तलावाचे संवर्धन होईल आणि पावसाळ्यात जलनगर परिसरात होणारी पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल.

ऐतिहासिक वारसा जतन
तलावाला लागून असलेली किल्ला भिंत आणि तलावाची पार म्हणून असलेली भिंत याची दुरुस्ती अत्यावश्यक असून, पुरातत्व विभागाकडून पाऊले उचलली गेली नसल्याने याबाबत पाठपुरावा करावा.

रेल्वे स्टेशनवरील प्रदूषणावर नियंत्रण
रेल्वे स्टेशनवर उतरवल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे लोडिंग-अनलोडिंग दरम्यान जमिनीवर पडणारे आणि पावसाळ्यात तलावात वाहून येणारे प्रदूषण थांबवण्यासाठी रेल्वेच्या साईडिंग बांधकामासोबतच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी यासाठी योग्य निर्देश देण्यात यावे.

इको-प्रो संस्थेच्या या मागण्यांमुळे चंद्रपूर शहरातील या ऐतिहासिक जलस्रोताचे संवर्धन होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल, तसेच शहराच्या मधोमध नागरिकांना एक सुंदर आणि सुरक्षित वारसास्थळ उपलब्ध होईल.