अकोला: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त लागत नसल्याने माजी मंत्री व प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu to field candidate in Election) यांची नाराजी वाढत आहे. ही नाराजी आता विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून प्रकट होण्याची शक्यता व्यक्त होत असून ३० जानेवारीला निवडणूक होणार आहे. कडू यांनी आगामी पदवीधर आणि शिक्षकच्या पाचही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. आपल्याला विश्वासात घेतले नसल्याने आपण पाचही मतदारसंघात उमेदार उभे केले आहेत, अशी घोषणा बच्चू कडूंनी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बच्चू कडूंचा प्रहार निवडणुकीच्या रिंगणात सत्तापक्षालाच आव्हान देणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, केवळ अमरावतीच नाही तर शिक्षक आणि पदवीधरच्या पाचही जागांवर आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. यासाठी मराठवाड्यातून डॉ. संजय तायडे, अमरावतीतून किरण चौधरी, कोकण विभागातून नरेश शंकर कौंडा, नागपुरातून अतुल रायकर तर नाशिकमधून अॅड. सुभाष झगडे असे पाच उमेदवार निवडणुकीत उभे राहतील. एक ते दोन जागा आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत, असा दावाही त्यांनी केलाय. शिंदे गट, प्रहार आणि भाजपा अशी युती करून उमेदवार द्यावेत, ‘
अशी विनंती मी त्यांना केली होती. मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. आम्ही आमचे उमेदवार उभे करणार असल्याची कल्पना मुख्यमंत्री एकनाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती. या निवडणुकांसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून परिश्रम घेत आहोत. तीन ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात मतनोंदणी देखील केली आहे. त्यामुळे आम्ही पाचही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, असेही कडू यांनी सांगितले.