राहुल गांधींवरील कारवाई, काँग्रेसचा विधानसभेतून सभात्याग

0

मुंबईः राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले असून या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी विधानसभेतून सभात्याग (Walkout from Legislative Assembly) केला. राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे अत्यंत दुर्दैवी व लोकशाही विरोधी घटना असून हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला. विधानसभेच्या पायऱ्यांवर या कारवाईच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. मेहुल चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र हजारो कोटींचा चुना लावून देशातून पळून गेलेत. राहुल गांधी हे या विरोधात आवाज बुलंद करीत असताना त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
विधान भवनाबाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी व लोकशाही विरोधी आहे. मोदी सरकारने लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. हा लोकशाहीविरोधी निर्णय आहे. सुरत न्यायालयात खोटा खटला दाखल करण्यात आला. त्यानंतर आता राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द करण्याचे पाप सरकारने केले. सरकारने ही कारवाई ठरवून केली. भाजप देशात लोकशाही विरोधी व्यवस्था तयार करण्याचे काम करत आहे. हे संविधान विरोधी कृत्य असून, काँग्रेस हा लढा रस्त्यावर उतरून लढेल, असे पटोले यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही या प्रकरणी मोदी सरकारवर निशाणा साधला. लोकसभेत अशा प्रकारची दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.