
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे घडला. आदित्य ठाकरे यांची सभा सुरु असताना काही लोकांनी गोंधळ घातला. ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा दावाही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला असून ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे (Aditya Thackeray security increased).
दरम्यान, हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे.
या प्रकरणाची दखल पोलिसांकडून घेण्यात आली असून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलिस तैनात असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान महालगावात यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी शुरु झाल्याने हा वाद झाला होता. मिरवणुकीच्या वेळी डीजे बंद करायला सांगितल्याने हा वाद सुरू झाला. या कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांचे भाषण सुरु असताना अज्ञात इसमाने स्टेजवर दगड भिरकावल्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दगडफेक व हल्ला करणारे आमदार रमेश बोरनारे यांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिस आधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.