अनुसूचित जमाती आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे वॉरंट

0

चंद्रपूर : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने बजावलेल्या समन्सला हजर न राहिल्याने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा अडचणीत आले आहेत. आयोगाने गौडा यांच्या अटकेचे वॉरंट जारी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे तक्रार दाखल केली (Arrest Warrant against Chandrapur Collector ) होती. गौडा यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचा सूचना केल्या होत्या. त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीला हजर राहण्यासाठी पाठवले होते. मात्र, आयोगाने ते अमान्य करीत अटकेचे वॉरंट जारी केले आहेत.

विनोद खोब्रागडे यांनी आदिवासींच्या जमिनीवरील माणिकगड सिमेंट कंपनीच्या अतिक्रमणाच्या मुद्यावरुन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगात धाव घेतली आहे. आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र जिल्हाधिकारी स्वतः हजर झाले नाहीत. त्यांच्या जागी त्यांनी उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशी यांना हजर होण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने पोलिस महासंचालकांना वॉरंट अरेस्ट ऑफ विटनेस पाठवून जिल्हाधिकाऱ्यांना २ मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. गौडा हे यापूर्वी सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपुरात नियुक्ती झाली आहे. पाच महिन्यांच्या काळात त्यांची कारकीर्द समाधानकारक असल्याचे बोलले जाते. आता या प्रकरणात जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.