रशियाने ब्रिटनला दाखविला आरसा
मॉस्कोः युक्रेनला शस्त्रपुरवठा करण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाने संतापलेल्या रशियाने ब्रिटनला त्याच्या वसाहतवादी इतिहासाचे स्मरण करुन दिले. भारतावर राज्य करताना ब्रिटनने कोट्यवधी डॉलर्सची साधन संपत्ती भारतातून लुटून नेली. त्या बळावर ब्रिटन श्रीमंत बनले. १८८० ते १९२० या कालावधीत भारतातील सुमारे १०० दशलक्ष जनता ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणांची शिकार ठरली होती. हा काळ ब्रिटीशांच्या भारतावरील राजवटीचा सर्वोच्च बिंदू होता व याच काळात भारतीय जनतेला मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, (UK Got Wealthier At Expense Of India) या शब्दात रशियाने ब्रिटनला आरसा दाखविण्याचे काम केले आहे. ही आकडेवारी आर्थिक मानवविज्ञानी जेसन हिकेल आणि डायलन सुलिवन यांच्या अभ्यासावर आधारित असल्याचे रशियाने नमूद केलेय.
ब्रिटीशाच्या राजवटीतील १९८० ते १९२० या कालावधित भारतात सुमारे १६५ दशलक्ष मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याचवेळी ब्रिटनने भारतातून अमाप संपत्ती लुटून नेली, अशी माहिती रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात देण्यात आलीय.
हिकेल आणि सुलिवन यांच्या अभ्यासाचा उल्लेख करून या निवेदनात म्हटले आहे की,भारतात १८८० च्या दशकात मृत्यूदर हा १ हजार व्यक्तींमध्ये ३७.२ इतका होता. तो १९१० मध्ये वाढून ४४.२ इतका झाला. या कालावधीत भारतीयांचे आयुर्मान देखील २६.७ वर्षांपासून घटून ते २१.९ वर्षे इतके झाले. १९४३ च्या काळात तत्कालीन बंगालमध्ये लक्षावधी भारतीयांचा मृत्यू ब्रिटीश पुरस्कृत मानववंशजन्य दुष्काळापायी झाला. ती मानवीय आपत्ती ब्रिटीशांच्या तत्कालीन वसाहतवादी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचा थेट परिणाम होती. त्याला तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे निर्णय मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. ब्रिटनच्या गरजा भागविण्यासाठी भारतातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा साठा जहाजांनी नेण्याचे आदेश चर्चिल यांनी दिले होते. त्याचा परिणाम म्हणून सुमारे तीन दशलक्ष भारतीयांचे मृत्यू झाले. रशियाने या निवेदनात ब्रिटनच्या वंशविद्वेषी धोरणाचा उल्लेख करताना विन्स्टन चर्चिल यांचे भारतीयांबद्धल नेमके काय मत होते, याचाही पुराव्यानिशी उल्लेख केला आहे. चर्चिल यांच्या वसाहतवादी धोरणांमुळेच भारतात मोठी मानवी आपत्ती आली होती, असे नमूद करण्यात आलेय.
ब्रिटीश साम्राज्याने भारतातून सुमारे ४५ ट्रिलियन डॉलरची संपत्ती लुटून नेली, असा उल्लेखही रशियाने सुप्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ उत्सा पटनायक यांचा हवाला देऊन केला आहे.