मुंबई : (mumbai) शिर्डीच्या साईबाबांबद्धल (Shirdi Saibaba) केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून बागेश्वरधामचे महंत(Dhirendra Shastri) धीरेंद्र शास्त्री यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Uddhav Balasaheb Thackeray)उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेने वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये यासंदर्भात लेखी तक्रार दिली आहे. युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानाचे माजी विश्वस्त राहुल कनाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. शिर्डीमध्ये असलेल्या साईबाबा भक्तांच्या भावनांशी धीरेंद्र शास्त्री खेळत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा आणि कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
साईबाबांची पूजा करावी की करू नये? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री साईबाबांबद्धल वादग्रस्त वक्तव्य केले. शंकाराचार्यांनी साईबाबांना ईश्वराचे स्थान दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे हे मत मानणे आमच्यासाठी अनिवार्य आहे. प्रत्येक सनातनी व्यक्तीचे हे कर्तव्य आहे. कारण शंकाराचार्य धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे साईबाबांना
ईश्वराचे स्थान देता येणार नाही, असे त्यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. तुलसीदास, सूरदास अशा सर्वच व्यक्ती या देव नाहीत तर महापुरुष आणि संत असतात. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, मात्र हेच सत्य आहे. साईबाबा हे देव नाहीत. साईबाबाांना आपण संत आणि फकीर म्हणू शकतो. पण ते देव असू शकत नाही, असे वक्तव्य देखील महंत धीरेंद्र शास्त्री यांनी केल्याचे नमूद आहे.