अमरावती : शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव आणि तळेगाव मोहना या दोन मंडळांना अतिवृष्टीचा निधी प्राप्त होऊ शकला नाही. 8 दिवसात ही मदत मिळाली तर या दोन्ही मंडळातील 14 हजार शेतकऱ्यांना खरीप पेरणीला मोठे आर्थिक मदत होऊ शकते. यासाठी आमदार बच्चू कडू यांनी थेट मुंबईत संचिवालयात बेमुदत उपोषणाचा शासनाला इशारा दिला आहे. याबाबतचे पत्र 5 जून रोजी संबंधित मंत्रालयाला दिली आहे. त्यानुसार आमदार बच्चू कडू 15 जून रोजी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या सचिवांचे दालनात आमरण उपोषण करणार आहेत. कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त लोकप्रतिनिधींनी आपल्या सरकारला हा घरचा आहेरच म्हणावा लागेल. 2022 च्या खरीप हंगामात चांदूरबाजार तालुक्यात सातही महसूल मंडळात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेतातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीला राज्य सरकारने तालुक्यात भरीव आर्थिक मदत दिली. परंतु या अतिवृष्टीच्या मदतीतून दोन महसूल मंडळांना मात्र वगळण्यात आले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.