अमरावती : भाजप व शिंद गटातील वादात आता माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची भाजपाचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची लायकी नाही, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. डॉ. बोंडे यांनी आधी आपली लायकी ओळखली पाहिजे. बेडूक कोण हे येणारा काळ ठरवेल, भाजपच्या नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करणे टाळावे, अन्यथा आम्ही योग्य उत्तर देऊ, असा इशाराही कडूंनी दिलाय. भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी वाशिम येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. त्याचे तीव्र पडसाद शिंदे गटात उमटले असून बच्चू या वादात उतरले आहेत.
बच्चू कडू म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता, तर भाजपाच्या आमदारांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली नसती. भाजपाच्या नेत्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. अजूनही काहीच सांगता येत नाही. डॉ. बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली पाहिजे, असे कडू म्हणाले.