गिरिशभाऊ बापट यांच्या निधनाने मार्गदर्शक हरपला-बावनकुळे

0

 

मुंबईः भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने आम्ही आमचा आधार, मार्गदर्शक व शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाचे हित जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गमावले, अशी शोकसंवेदना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केली.आपल्या शोकसंदेशात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, गिरीशभाऊचे निधन हे सहन न होण्यापलिकडचे दु:ख आहे. भाजपाचे प्रचंड मोठे नुकसान झाले. संपूर्ण आयुष्य सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि सर्व स्तरावर काम करून समर्पित आयुष्य ते जगले. भाजपची मोठी शक्ती निघून गेली. भाजपचा कार्यकर्ता किती प्रामाणिक असतो हे त्यांच्याकडून आम्ही पाहिले आहे. कसब्याच्या निवडणुकीत त्यानी स्वत: आग्रह केला. मला बाहेर का ठेवता अस म्हणत त्यानी निवडणुकीत स्वत: सहभागी झाले.केवळ भाजपाच्या लोकांचा नाही तर सर्व पक्षातील लोकांचे त्यांच्यावर प्रेम होते. त्यांच्यासोबत काम करताना आम्हाला त्यांचा आदरपूर्वक धाक होता. आम्ही मंत्रिमंडळात सोबत काम केले. अनके आठवणीचा ठेवा आहे. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.
महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या उभारणी करणार्‍या नेत्यांमध्ये ते अग्रणी होते. केवळ पुण्यातच नाही, तर महाराष्ट्रात पक्षावाढीसाठी मोठं योगदान आहे. त्यांनी विविध पदावर असताना संस्कार देऊन त्यांनी काम केले. राजकारणातील त्यांनी दिलेली शिकवण कायमच आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले. त्यांचे निधन ही भारतीय जनता पक्षाची अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सर्व भाजपा कार्यकर्ते शोकात असल्याचेही श्री बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून गिरीशजींची वाटचाल सुरु झाली. संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. तब्बल चार दशकांच्या त्यांच्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीत त्यांनी आपली छाप सर्वच क्षेत्रात सोडली. त्यांनी आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष भूषविले होते.