चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पावले

0

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन निश्चित ; पर्यायी घरांची हमी

चंद्रपूर (CHANDRAPUR), दि. 3: चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्म वीर मीना यांनाही पत्र पाठवून चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा उपस्थित केली होती.चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पावले उचलल्या जात असून अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

नियोजन भवन सभागृह येथे रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देणे व इतर समस्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागिय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, रेल्वे विभागाचे सहाय्यक मंडळ अभियंता सुबोध कुमार, कार्यकारी अभियंता नवीन शर्मा, उपकार्यकारी अभियंता योगेंद्र कुमार तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहरात सध्या तिसरी रेल्वेलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून, या प्रकल्पात सुमारे 640 घरे बाधित होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम जबरदस्तीने न करता नागरिकांच्या सहकार्याने पार पाडावे, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. या प्रकल्पादरम्यान बाधित होणाऱ्या 68 घरांचे सर्वेक्षण करून, संबंधित नागरिकांशी बैठक घ्यावी. तसेच रेल्वे विभागाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसनाची ठोस व्यवस्था करावी. या पुनर्वसनासाठी म्हाडा येथील उपलब्ध घरांची पाहणी करण्यात येईल. महानगरपालिकेने
रेल्वे लाईनमधून जाणाऱ्या नाल्यांची योग्यरीत्या स्वच्छता करावी. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिक्रमित घरांची सविस्तर यादी तयार करावी. रेल्वे लाईनसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने सीएसआर (CSR) अंतर्गत स्थानिक विकासासाठी निधी खर्च करावा. दरम्यान, रेल्वे विभागामार्फत येत्या दोन महिन्यांत अतिक्रमित 68 घरे हटविण्यात येणार असून, संबंधित नागरिकांना म्हाडामार्फत 100 घरे तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील. पुढील दीड वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्याने एकूण 900 घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.

या संपूर्ण प्रक्रियेस गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत झूमद्वारे उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

सर्व नागरिकांना कठीण व मानसिक तणावाच्या परिस्थितीतून बाहेर काढल्याबद्दल नागरिकांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.