कन्नड संघटनांची महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक

0

फडणवीस-बोम्मई यांच्यात चर्चा, पवारांचा इशारा

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर(Maharashtra and Karnataka Border Dispute) बेळगावजवळ कन्नड संघटनांनी उच्छाद मांडला. कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे आज बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर हे प्रकार करण्यात आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन या घटनेचा निषेध व तीव्र शब्दात नाराजी नोंदविली. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केला. तरीदेखील कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्यामुळे आता संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्राला डिवचण्याचे काम कन्नड रक्षण वेदिकेकडून करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
शरद पवारांचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयात राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होते. मात्र ती भूमिका घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे सीमाभागात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.