समाजाच्या उत्तम भविष्यासाठी संस्कृतीची माहिती नव्या पिढीला आवश्यक -: उपमुख्यमंत्री 

0

 

 

-लक्ष्मीनगरात गुढीपाडव्याला नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत

 

नागपूर – ज्या समाजाला स्वतःच्या दैदिप्यमान इतिहासाचा विसर पडतो. त्याला उत्तम भविष्य नसते. आपली प्राचीन सभ्यता व संस्काराला न विसरता वाटचाल असली पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लक्ष्मीनगर परिसरातील तात्या टोपे गणेश मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेमध्ये फडणवीस सहभागी झाले. या उत्सवात सहभागी झालेल्या नागरिकांना ते संबोधित करत होते. यावेळी अभिनेत्री गिरिजा ओक, मृणाल देव, आयोजक माजी महापौर संदीप जोशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभिनव पद्धतीने हिंदू नववर्षाचा महोत्सव नागपुरात होत असल्याचा आनंद उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. श्रीरामाच्या जयघोषात, मंगलमय वातावरणात नूतन वर्षाचा हा उपक्रम स्त्युत्य असून उत्तरोत्तर यामध्ये भर पडत जावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

दरम्यान,३१ डिसेंबरच्या रात्री नववर्षाचा उत्सव साजरा करण्याला विरोध नाही. मात्र, तो कसा साजरा होतो हे सर्वांनाच माहिती आहे. तथापि, नववर्षाचा आनंद हा कसा मंगलमय वातावरणात साजरा करावा, याचा वस्तूपाठ आज या कार्यक्रमाने घालून दिला असल्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी अभिनेत्रीद्वय गिरिजा ओक, मृणाल देव यांनीही नागपूरकराना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले.