माझं लक्ष ‘सीएम’ म्हणजेच ‘कॉमन मॅन’ कडे-सुधीर मुनगंटीवार

0

मुंबईः “आयुष्यात मुख्यमंत्री होण्याचा संकल्प घेऊन मी राजकारणात आलेलो नाही. माझे लक्ष मात्र ‘सीएम’ म्हणजेच ‘कॉमन मॅन’ कडे आहे. सामान्य माणसासाठी आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे ‘मी मुख्यमंत्री कधी होणार’ असा प्रश्न विचारत असतील तर त्यांचे म्हणणे फार गांभीर्याने घेऊ नका. विरोधी पक्ष म्हणून भ्रम निर्माण करणे, ही नीती गोबेल्सपासून तर जयंत पाटलांपर्यंत चालत आली आहे…” या शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Senior BJP Leader Sudhir Mungantiwar) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. एबीपी माझा या वाहिनीच्या वतीने आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलताना मुनगंटीवार यांनी चौफेर फलंदाजी केली. याच कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार हे मुख्यमंत्री कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांना पक्षातीलच लोकांनी मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असा प्रश्न मुनगंटीवार यांना विचारण्यात आला असता मुनगंटीवार यांनी अगदी स्पष्टपणे भाजपची भूमिका मांडली. मुनगंटीवार म्हणाले, “भाजप हा पक्ष देशाला आपला परिवार मानतो. परिवाराला देश मानत नाही. कुठल्याही पक्षात कोणीतरी एक व्यक्ती सीएम होऊ शकते. त्यामुळे स्पर्धा कशी काय होऊ शकते. याच खुर्चीच्या प्रेमापोटी सीएम म्हणजे कॉमन मॅन कडे दुर्लक्ष कसे होते, हे अडीच वर्षात पाहिले. त्यामुळे पक्षात कुणीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करीत नाहीत. अगदी स्वप्नात जरी विचारले तरी नाही..”
२०२४ मध्ये कोण मुख्यमंत्री?
2024 कोण मुख्यमंत्री होणार? या प्रश्नावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, काही प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी ती काळावर सोडावी लागतात. आज या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे परीक्षा एप्रिलमध्ये आणि डिसेंबरमध्ये उत्तर देण्यासारखे होईल. भाजप जे सेवाकार्य करते, ते मिशन समजून करते व इतर राजकारणी नेते हे निवडणूक, इव्हीएम, खुर्ची, सत्ता लक्षात घेऊन कार्य करतात. आमच्यात व त्यांच्यात हाच फरक आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

ठाकरेंचे ब्रेन हॅक झालेय

उद्धव ठाकरे आणि तुमचे संबंध कसे आहेत? या प्रश्नावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, अलिकडच्या काळात संवाद झाला नाही. मात्र, पूर्वी मी त्यांना याबद्धल खूप समजाविण्याचा प्रयत्न केला. प्रश्न खुर्ची किंवा मुख्यमंत्रीपदाचा नाही तर जे द्वेषाचे वातावरण आहे ही चिंतेची बाब आहे. खुर्चीपेक्षा देश मोठा आहे. बरेच वेळा चर्चा झाली. पण नंतर असे लक्षात आले की त्यांच्यात बदल होईल, असे वातावरण शिल्लक राहिलेले नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर त्यांचे ब्रेन हॅक केलं गेलंय…हॅकर कोण आहे, हे सर्वांनाच माहितीय. हॅकर महाराष्ट्रातीलच आहेत..असेही मुनगंटीवार म्हणाले.

वाढते प्रदूषण चिंतेचा विषय

वाढते प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. सन 2000 पासून सन 2022 पर्यंत प्रदूषणापायी होणाऱ्या मृत्यूंमध्ये तब्बल तिनशे पटींनी वाढ झाली असून हा चिंतेचा विषय आहे. या गंभीर प्रश्नाकडे आज लक्ष दिले नाही तर आज ताटात जेवढे अन्न घ्यावे लागते, तेवढेच औषधही घ्यावे लागेल. त्यासाठी प्रदूषण नियंत्रणाचे काम करावे लागेल, असे मुनगंटीवार म्हणाले.