नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शासकीय व निम शासकीय इमारतीच्या कुंपण भिंतीवर, मोक्याच्या ठिकाणी भित्तीचित्र रेखाटन स्पर्धेला सुरूवात झाली
आहे. शहराच्या घाणेड्या झालेल्या भिंतींची सुंदरता वाढत असतांना बघून नागपूरकरांना देखील अतिशय आनंद होत आहे स्पर्धेबाबत नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत असून, ५५० हुन अधिक गट ५ ते ७ चित्रकारांचा समूह यांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. स्पर्धेत चित्रकार विद्यार्थी आणि व्यवसायिक चित्रकारांनी उत्तम सहभाग नोंदविला आहे. शहर सौंदर्यीकरणाच्या उद्देशपूर्तीसाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.नागपूर महानगरपालिकेद्वारे शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य वॉल पेंटिंग स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी गट आणि व्यावसायिक चित्रकार असे दोन गट सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी चित्रकारांना स्वच्छ भारत अभियानावर आधारित ३२ विषयाला अनुसरून शासकीय व निमशासकीय इमारतींच्या भिंतीवर चित्र काढायचे आहेत. तसेच दर्शनीय खासगी भिंतींवर त्यांच्या अनुमतीने चित्र काढायचे आहेत. याकरिता चित्रकाराला सहमती घेणे आवश्यक आहे. यात चार ते पाच कलावंतांचा व विद्यार्थ्यांचा गट तयार करून भित्तीचित्र काढावयाचे आहे. स्पर्धेचे साहित्य सामग्री आयोजकाकडून पुरविण्यात येईल. स्पर्धकांसाठी नमूद केलेल्या कालावधीतच भित्तीचित्र पूर्ण करणे अपेक्षित असून, प्रत्येक कलावंताला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या भिंतीवर पेंटिंग केली जाईल ती भिंत १० मीटर लांबीची असणे आवश्यक आहे.चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातून स्पर्धेची नोंदणी करावयाची आहे. व्यावसायिक चित्रकारांनी आपली नोंदणी शासकीय चित्रकला महाविद्यालय दीक्षाभूमी येथे करावी. महाविद्यालयीन विद्यार्थी चित्रकारांच्या चित्रांची त्यांच्या महाविद्यालयीन प्राध्यापक किंवा आयोजकामार्फत निवड करावी. पुरस्कारांची निवड पुरस्कार निवड समितीतर्फे करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरणाची तारीख व दिवस स्पर्धकांना मोबाईलद्वारे कळविण्यात येणार आहे असे राम जोशी यांनी सांगितले.