नागपूरः ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे. या निमित्ताने या अजरामर गीताचे कवी असलेले नागपूरकर स्व. राजा बढे यांनाही यथोचित सन्मान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राजा बढे यांची संपादक, चित्रपट निर्माते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक अशी चतुरस्त्र ओळख असली तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. सीमा आंदोलन व संघर्षाच्या काळात त्यांचे हेच गीत मराठी मनांना संघर्षाची प्रेरणा देणारे ठरले.
नागपुरात तुळशीबाग येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. नागपुरात जन्मलेल्या राजा बढे यांचे माध्यमिकचे शिक्षण नागपुरातील टिळक विद्यालयात झाले आहे.
त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात पत्रकारितेने झाली. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी आकाशवाणीला सेवा दिल्यावर त्यांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. “स्वानंद चित्र’ ही संस्था उभी केली आणि ’रायगडचा राजबंदी’ हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट त्यांनी काढला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांची असंख्य गीते गाजली आहे. त्यापैकी पन्नासच्या दशकातील त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायक शाहीर साबळे यांनी अजरामर केले. या गीताला श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले होते. राजा बढे यांच्या नावे १८ कवितासंग्रह, ४ नाटके, ९ संगीतिका, ५ एकांकिका, एक कादंबरी आहे. शिवाय त्यांनी प्रसिद्ध साहित्याचे भावानुवाद देखील केलेले आहेत.