नक्षल प्रभावित दुर्गम भागात संविधान जनजागृतीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार
महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित भाग म्हणून ओळखला जातो. हिरव्याकंच वनराईने नटलेल्या या जिल्ह्य़ाला लागलेले हे ग्रहणच. पण याही ग्रहणातून बाहेर पडत काही तरुण युवक युवती या भागाच्या विकासासाठी कार्यरत आहेत हे विशेष.
लालसू नागोटी हा असाच एक तरुण. शिक्षण घेऊन माडीया जातीतील पहिला ॲडव्होकेट म्हणून आज लालसू नागोटी आज या भागात सुपरिचित आहे. याच तरुणाने याच भागातील आपल्या मित्रांसह भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे माडीया भाषेत भाषांतर केले आहे.गडचिरोलीतील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भामरागड, एटापल्ली, अहेरी, धानोरा व छत्तीसगड सीमावर्ती भागात आदिम माडिया समाज आहे. मागील वर्षी पाथ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ९४ टक्के माडिया समाज बांधवांनी ‘संविधान’ हा शब्दच ऐकला नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ही बाब लक्षात घेता भारतीय संविधान उद्देशिकेचा स्थानिक आदिम माडिया भाषेत भामरागड येथील माडिया समाजातील पहिले वकील ॲड.लालसू नोगोटी, हेमलकसा येथील चिन्ना महाका व चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर या सामाजिक कार्यकर्त्यांनी अनुवाद केला आहे.
स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतरही भारतीय संविधान या परिसरातील त्यांच्या दैनंदिन बोलीभाषेत पोहोचणे गरजेचे आहे. संविधान उद्देशिका म्हणजे संविधानाच्या प्रतीचा सार आहे. त्यामुळे या उद्देशिकेच्या माध्यमातून नक्षल प्रभावित भागात संविधानाबाबत जनजागृती करण्याचा एक सकारात्मक अन् प्रामाणिक प्रयत्न. ॲड. लालसर नागोटी, चिन्ना महाका , अविनाश पोईनकर यांच्याद्वारे केला जातो आहे. माडिया समाजामध्ये या संविधान उद्देशिकेच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती निर्माण झाल्यास कालांतराने हक्काबाबत, देशाचे संविधान अवलंबण्याबाबत आमुलाग्र बदल होईल. शिवाय संविधान तळागाळात- घराघरांत पोहोचवणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. या दृष्टिकोनातूनही हा एक महत्वपूर्ण असा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
अनुवादाबाबत प्रशासन अनभिज्ञ
संविधान म्हणजे काय, हे समजावून सांगण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या दुर्गम भागामध्ये प्रशासन गेली अनेक दशके प्रयत्न करीत असले तरी आदिम माडिया भाषेतून ते नागरिकांपर्यंत पोहोचले नाही. संविधान उद्देशिकेचा आजवर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. मात्र, आदीम अन् त्यातल्या त्यात नक्षल प्रभावित भागातील या माडिया भाषेत संविधान उद्देशिकेचा अनुवाद पहिल्यांदाच झाला असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासन या अनुवादाबाबत सध्या अनभिज्ञ असले तरी या राष्ट्रीय कार्याची दखल घेवून या दुर्गम परिसरात शाळा, महाविद्यालय, शासकिय-निमशासकिय कार्यालयातून माडिया भाषेतील संविधान उद्देशिका पोहोचवून जनजागर करणे आवश्यक आहे. असे मत ॲड. लालसू नागोटी, चिन्ना महाका, व अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले.