नागपूर: “राहुलजी गांधींनी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाची माफी मागावी. येत्या निवडणुकीत काँग्रेसला त्रास होण्यापासून वाचवण्यासाठी आणि ओबीसी व्होटबँकेला भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी राहुल गांधींनी माफी मागावी. 2019 मध्ये त्यांच्याकडून चुकून काही शब्द निघाले असतील, आणि त्यामुळे मोठा ओबीसी समाज नाराज असेल तर त्यांना नक्कीच माफी मागावी, ही आमची मागणी असेल. एखाद्या समाजाला चोर म्हणणे नक्कीच चांगली गोष्ट नाही. याआधीही राहुलजींनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये माफी मागितली आहे. पण इथे ओबीसी समाजाचा मुद्दा आहे. राहुलजींनी माफी मागितली तर त्यांची प्रतिमा अधिक उठून दिसेल. आणि हा जो सगळा प्रकार सुरू आहे, तो शांत व्हायला काँग्रेसला मदत मिळेल. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे इतर काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु, हा भावनांचा प्रश्न आहे. इथे फ़क़्त एक व्यक्ती दु:खी होत नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाला दुःख होत आहे. राहुलजींनी मोठ्या मनाने माफी मागावी, ही आमच्यासारख्या नेत्यांची मागणी आहे. ‘चौकीदार चोर है’ च्या संदर्भातही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) मध्ये नाराजी व्यक्त केली होती. त्यातही राहुलजींना कोर्टात माफी मागावी लागली होती. पण तोपर्यंत 2019 मध्ये काँग्रेसला फटका बसून चुकला होता. काही दिवसांत कर्नाटकात आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये निवडणुका आहेत, जिथे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. येत्या 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. या सर्व निवडणुकीत काँग्रेसने ओबीसी समाजाला आपलेसे करून घेण्याची गरज आहे. आणि अशा परिस्थितीत जर काही चुकीच्या शब्दांमुळे ओबीसी समाज नाराज झाला असेल तर नक्कीच माफी मागून घ्यावी, जेणेकरून ओबीसी समाज सावरेल, समजून घेईल आणि पुन्हा एकदा काँग्रेससोबत पूर्ण उत्साहाने राहू शकेल. माझे वडील श्री. रणजितबाबू देशमुख हे दोन वेळा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मंत्री राहिले आहेत. मी आमदार राहून चुकलो आहे.
मी काँग्रेसच्या तिकिटावर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूकही लढवली आहे. मला आशा आहे की, माझ्या या विधानाने काँग्रेस पक्षाचे हायकमांड नाराज होणार नाहीत. ओबीसी समाजाने नाराज होऊ नये, हे महत्त्वाचे आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना मी निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा राहिलो. त्यावेळी मला प्रचारासाठी फक्त 10-11 दिवस मिळाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आपला ओबीसी समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. ओबीसी समाजाने काँग्रेसशी जुळलेले राहावे, हीच आमची इच्छा आहे. निवडणूक प्रचारादरम्यान चुकून काही शब्द निघाले असतील, काही जुमले निघाले असतील, तर ते परत घेऊन त्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात शंका किंवा कुशंकांना स्थान नसावे. राहुलजी हे मोठ्या मनाचे, चांगले हेतू असलेले व्यक्ती आहेत. त्यांनी ओबीसी समाजाला खुल्या मनाने आपलेसे करावे. ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर नक्कीच माफी मागून त्यांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना काँग्रेससोबत ठेवावे. आमचे प्रदेशाध्यक्षही ओबीसी समाजाचे असून ते विदर्भातील आहेत. तेदेखील निश्चितपणे याच भावनेशी जुळलेले असतील. आमचे काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाच्या भावना काँग्रेस पक्षाच्या हायकमांडपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे. राहुलजींसारख्या सकारात्मक व्यक्तीने लवकरात लवकर माफी मागून पुन्हा एकदा ओबीसी समाजाला जवळ करण्यात यश मिळवावे, अशी अपेक्षा आहे. माफी मागून हा विषय इथेच संपवायला हवा”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी नागपुरात व्यक्त केली. सध्या ओबीसी समाजाचे प्रकरण पाहता त्यांनी वार्तालाप करतांना ही माहिती दिली.