विदर्भात दोन दिवस पावसाच्या सरी, गारठा आणि धुके वाढले

0

नागपूर :राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी जोरात आहे. किमान तापमानात घट झाल्याने नागपुरात कमालीचा गारठा वाढला आहे. दिवसभर अनेक भागात विशेषतः पोलिस लाईन टाकली, सिव्हिल लाईन्स परिसरात दिवसाही वाहनचालकांना वाहनाचे लाईट सुरू ठेवून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र दिसले. विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर महाराष्ट्रासह, उत्तर मराठवाड्यात गारठा कायम आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानाचा पारा काहीसा घसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या उत्तरेकडील भागात गारठा कायम असला तरी नागपूर आणि परिसरात काल रात्री, आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील अनेक ठिकाणी पारा घसरला आहे. यामुळे नागपूरकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. ढगाळ वातावरण आणि पारा घासरल्याने अनेक भागात धुके सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

वाहने चालविताना काळजी घ्यावी लागट आहे. राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक,कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याचं आठवड्यात राज्यात हुडहूडी भरणारी थंडी जाणवली. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतातही दाट धुके पडण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका लांब पल्ल्याच्या उत्तर दक्षिण जोडणाऱ्या रेल्वेगाड्या तसेच दिल्ली , रायपूर, नागपूर, इंदोर अशा हवाई सेवेला बसण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण दूर झाल्यानंतर पुन्हा संक्रांतीपूर्वी जोरदार थंडी पडू शकते हे निश्चित.