संजय राऊत म्हणाले, “१४ फेब्रुवारीला सारे काही प्रेमानं होईल…”

0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी (Maharashtra political crisis) 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून “घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल. 14 फेब्रुवारी व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल” असे ते म्हणाले आहेत. सलग सुनावणी होणे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगत आमचा विजय होईल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना फोडणे हे शरद पवार यांचे नव्हे तर बाजपचे स्वप्न होते. भाजपचे हे राष्ट्रीय धोरण आहे. या कटात ते सामील झाले आहेत. आता राज्यातील घटनाबाह्य सरकारचा मृत्यू ठरलेला आहे, अशी टीका त्यांनी केली.
खासदार राऊत म्हणाले की, या प्रकरणाचा वेळेत निकाल लागल्यास फेब्रुवारीपर्यंत हे सरकार कोसळेल. कोणत्याही दबावाखाली स्वायत्त संस्था येऊ नये. या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही हे या प्रकरणावरुन दिसून येईल. आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही. आता सरकार आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करेल, असा दावा त्यांनी केला. आम्ही अधिवेशनात काढलेली प्रकरणे ईडीला दिसत नाहीत का, असा सवाल राऊत यांनी केला.


राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार असून शिवसेनेतील बंडाळी, विधानसभा अध्यक्ष निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.