Home Top News “तीन महिन्यात सरकार जाणार..”, राऊतांनी पुन्हा सांगितला मुहुर्त

“तीन महिन्यात सरकार जाणार..”, राऊतांनी पुन्हा सांगितला मुहुर्त

0

मुंबई : सरकार अमूक महिन्यात पडणार, असा वारंवार मुहुर्त सांगणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (MP Sanjay Raut) पुन्हा सरकार कोसळण्याचा मुहुर्त सांगितला आहे. राज्यातील सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टानं शिंदे-फडणवीसांना उघडे पाडल्याचा दावा राऊतांनी केलाय. फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करु शकत नाही, हे न्यायालयाने सांगितले असल्याचे नमूद करून या सरकारचा मृत्यू अटळ आहे व हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत, आदेश पाळाल तर अडचणीत याल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नैतिकतेच्या आधारावर राजीनामा

राऊत म्हणाले की, आम्ही सत्तेसाठी भुकेले नाही. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंचे काहीही चुकलेले नाही. अधिकाऱ्यांनी आणि प्रशासन पोलिसांनी या सरकारचे आदेश पाळू नयेत. कारण हे सरकार बेकायदेशीर असल्याचे राऊत म्हणाले.

ते अनेक पक्ष बदलणारे नेते

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अनेक पक्ष बदललेले गृहस्थ आहेत. ते काँग्रेसमध्ये होते. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये होते व आता भाजपमध्ये आहेत. पुढे ते कुठे असतील ते मला माहित नाही. त्यांना कोणतेही राजकीय स्थैर्य नाही. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निवाड्यानुसार न्याय करावा लागेल, असेही राऊत म्हणाले.

नाना पटोलेंचा राजीनामा ही मोठी चूक-अजित पवार

मुंबई : काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदार निलंबित झाले असते, असा दावा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलाय. (Leader of Opposition Ajit Pawar) पटोले यांनी राजीनामा दिला ही आमची चूक असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. नाना पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर 16 आमदार निलंबित झाले असते, असेही पवार म्हणाले. नैतिकतेवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजीनामा देतील, अशी स्वप्न पाहू नये अशी टीकाही त्यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना पवार यांनी आपली मते मांडली.

अजित पवार म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची उंची आताचे भाजपचे नेते गाठू शकत नाही. नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याचा विचार ते स्वप्नातही करु शकत नाही. राजीनाम्याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे की जे मला त्यावेळेस योग्य वाटले ते केले. असा प्रसंग कोणावरही येऊ नये. आला तर आताच्या अनुभवावरून निर्णय द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. मी दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते की हा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात येईल. मात्र या निकालाचे दूरगामी परिणाम होतील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पक्षांतर बंदी कायद्याला कितपत अर्थ उरेल किंवा अर्थ राहील की नाही, याची भीती वाटते. राज्यात अशा घटना घडल्या की राजकीय स्थिरतेवर परिणाम होतो, असे ते म्हणाले.
तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी कोणाला न सांगता राजीनामा दिला. तो द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा दिल्यावर कळले की राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेले हे पद महाविकास आघाडीकडून तातडीने भरले गेले नाही. ते भरले गेले असते तर 16 आमदार अपात्र ठरले असते. मी याबाबत कोणाला दोष देत नाही. पण महाविकास आघाडीकडून हे पद भरायला हवं होतं, असेही अजित पवार म्हणाले.