मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री या नात्याने प्रथमच अर्थसंकल्प मांडणार असून (Maharashtra Budget 2023) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांद्वारे ते जनतेला दिलासा देणार का याची उत्सुकता आहे. विधिमंडळात दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून या अर्थसंकल्पात अर्थमंत्री या नात्याने फडणवीस कोणत्या घोषणा करतात, याकडेही बळीराजाचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. यात मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या पालिकांचा समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या अनुषंगानेही अर्थसंकल्पात काही घोषणा होणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बुधवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या प्रगतीचा वेग मंदावल्याचे स्पष्ट दिसत असून हा वेग वाढविण्यासाठी कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रावर सरकारची भिस्त आहे. कोरोना संकट ओसरल्यानंतरही राज्याच्या प्रगतीची चाकं वेगाने फिरत नसल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे. आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकासदर 6.8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ठेवलेलं 12.1 टक्के आर्थिक विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यात अपयश आले आहे. हा दर 9.1 टक्क्यांवर आलाय. तर पुढील वर्षासाठी तो केवळ 6.8 टक्के असेल, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त झाला आहे. त्यामुळे आता शिंदे फडणवीसांचा अर्थसंकल्प राज्याला काय देणार, याकडे लक्ष लागले आहे. सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.